Raghuram Rajan : रघुराम राजन करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? सांगितले भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे कारण | पुढारी

Raghuram Rajan : रघुराम राजन करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? सांगितले भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे कारण

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन हे डिसेंबरमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यानंतर रघुराम राजन (Bharat Jodo Yatra) राजकारणात प्रवेश करणार याची कयास बांधला जात होता. रघुराम राजन यांनी मात्र सध्या आपल्या राजकारणातील प्रवेशाच्या अफवांना फेटाळून लावले आहे. रघुराम राजन म्हणाले की, मी एक ‘चिंताग्रस्त नागरिक’ म्हणून भारत जाडो यात्रेत सहभागी झालो होतो. रघुराम राजन यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबतचा भारत जोडो यात्रेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Raghuram Rajan)

भारत जोडो यात्रेत का सहभागी झाले रघुराम राजन ? (Raghuram Rajan)

रघुराम राजन म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल-गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रेत मी एक नोकरशहा किंवा अर्थतज्ज्ञ म्हणून सहभागी झाले नव्हतो. उलट एक जागरूक आणि चिंताग्रस्त नागरिक म्हणून सहभागी झालो होतो. २ जानेवारी रोजी एका लिंक्डइन पोस्टमध्ये, राजन म्हणाले की, ‘राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सलोखा मजबूत करण्यासाठी भारतभर फिरत असलेल्या एकनिष्ठ नागरिकांना आपला पाठिंबा देण्यासाठी मी काही किलोमिटर चाललो आहे.’

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपण येणाऱ्या वर्षासाठी काही संकल्प करत असतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपण सर्वांनी आपल्याला प्रिय असलेला भारत जपला पाहिजे. आरबीआयचे माजी प्रमुख असेही म्हणाले की, बहुसंख्यांकवादामुळे आपला देश कमकुवत होत आहे. हे लोक अविश्वास आणि विभाजन पेरत आहेत. ते बहुसंख्य समाजाला इतिहासातील चुकीचा बदला घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. ज्यासाठी आज कोणीही जबाबदार नाही. सत्तेचे केंद्रीकरण करताना ते माहिती आणि टीकेला दडपून टाकत आहेत. (Raghuram Rajan)

‘चांगल्यासाठी अपार क्षमता’

राजन यांनी असेही म्हटले, की देशाची ताकद तर्कसंगत वादविवादांमध्ये आहे, ज्यामुळे प्रत्येकाला असे वाटते की त्यांनी योगदान दिले आहे. शालीनता, सहिष्णुता, परस्पर आदर आणि संवादाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या भूमिकाचा वापर करून भारतात चांगल्या गोष्टी घडवण्याची अफाट क्षमता असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

जागतिक विकासात भारत मोठे योगदान देऊ शकतो

पोस्टमध्ये राजन यांनी असे म्हटले आहे की, अचूक आकडेवारी आणि ठोस आर्थिक धोरणांद्वारे भारत येत्या काही दशकांमध्ये जागतिक विकासात मोठे योगदान देऊ शकतो. यापूर्वी, माजी आरबीआय प्रमुख राहुल गांधी यांच्या मुलाखतीत म्हणाले होते की, 2023 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तसेच उर्वरित जगासाठी कठीण असेल. पुढच्या वर्षी देशाने ५ टक्के विकास दर गाठला, तर ती एक मोठी गोष्ट असेल. कारण मुख्य व्याजदर वाढले आहेत आणि निर्यात मंदावली आहे.


अधिक वाचा : 

Back to top button