Indo-China Border : चीन सीमेवर भारताच्या सुखोई, राफेलची धडक! | पुढारी

Indo-China Border : चीन सीमेवर भारताच्या सुखोई, राफेलची धडक!

इटानगर, वृत्तसंस्था : Indo-China Border : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय जवान आणि चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक धुमश्चक्रीनंतर आता भारतीय हवाई दलाने गुरुवारीच चीन सीमेवर दोन दिवसीय युद्धाभ्यास सुरू केला आहे. सुखोई 30 एमकेआय आणि राफेलसह हवाई दलातील जवळपास सर्वच आघाडीची युद्धविमाने या युद्धसरावात सहभागी झालेली आहेत. चीनला जशास तसे टक्कर देण्याच्या या भारताच्या मिरर टेक्निकने (आरसा तंत्र) चीनला धडकी भरली आहे.

Indo-China Border : गलवान खोर्‍यातील हिंसक धुमश्चक्रीपूर्वीच भारताने चीनच्या सीमेवरील हालचाली पाहता मिरर टेक्निक (आरसा तंत्र) अमलात आणणे सुरू केले होते. चीनने रस्ते बांधले. भारतानेही रस्ते बांधले. चीनने लष्कराच्या द़ृष्टीने पायाभूत सुविधांची निर्मिती केली. भारतानेही लगोलग हे काम सुरू केले. चीनने सीमेवर 50 हजार सैनिक तैनात केले.

Indo-China Border : भारतानेही एवढ्याच संख्येने सैनिक तैनात केले. चीन जे कृत्य सीमेवर करेल, तेच कृत्य उत्तरादाखल भारताने लगेच केले. थोडक्यात, सीमेच्या अलीकडे भारताने चीनला सीमेच्या पलीकडलेच द़ृश्य हुबेहुब दाखविले. (यालाच मिरर टेक्निक म्हणतात) सीमेपासून 155 कि.मी.वरील हवाई तळावर चीनच्या युद्धविमानांची आणि ड्रोनची उपग्रहीय छायाचित्रे जारी होताच भारतीय हवाई दलाने आपल्या युद्धसरावासाठी चीन सीमा निवडली.

Indo-China Border : चीन सीमेवरील आपल्या क्षमता या सरावातून भारत जोखणार आहे. अर्थात भारताचा हा युद्धसराव तवांगमधील धुमश्चक्रीपूर्वीच नियोजित होता. मात्र धुमश्चक्रीनंतर या युद्धसरावाचे स्वरूप अधिक व्यापक करण्यात आले आहे. हवाई दलाचा हा सराव तेजपूर, चाबुआ, जोरहाट आणि हासिमारा हवाई तळावंवरून होणार आहे. हवाई दलाच्या इस्टर्न कमांडकडून ईशान्य भारताला लागून असलेल्या चीनसह बांगला देश आणि म्यानमारच्या सीमेवरही पाळत ठेवली जाणार आहे.

तवांग सेक्टरमधील यांगत्से सेक्टरमधील स्थिती एकतर्फी बदलण्याच्या चिनी सैनिकांच्या 9 डिसेंबरच्या प्रयत्नापूर्वी चीनने या भागात ड्रोनसह काही युद्ध विमाने तैनात केली होते. यावेळी चिनी ड्रोन एलएसीच्या अगदी जवळ आले होते. भारतीय हवाई दलाने हे ड्रोन पिटाळून लावले होते.

Indo-China Border : जवानांकडून धुलाईनंतर साहित्य सोडून पळाले चिनी

इटानगर : तवांग सेक्टरमध्ये झालेल्या भारत-चीन धुमश्चक्रीत भारतीय जवानांनी मजबूत धुलाई केल्याने चिनी सैनिकांना अखेर पळ काढावा लागला. जीवाच्या आकांताने पळण्याच्या गडबडीत चिनी सैनिक आपले बरेच साहित्य मागे तसेच सोडून गेले. धुमश्चक्रीनंतर या ठिकाणी चिन्यांच्या साहित्याचा खच पडलेला होता. भारतीय जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून चिन्यांच्या स्लीपिंग बॅग आणि इतर उपकरणे आणि साहित्य हस्तगत केले आहे. त्याचे छायाचित्रही समोर आले आहे. सापडलेल्या स्लीपिंग बॅग या खास थंड तापमान व खुल्या जागेतील रहिवासासाठी वापरल्या जातात. तवांगमधील यांगत्से येथील अस्थायी भिंतीवरील तारकुंपण तोडून 600 वर चिनी सैनिक भारतीय हद्दीत प्रवेश करू पाहत होते.

हे ही वाचा :

DRDO : अग्नी-5 क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी; चीनला इशारा!

Chinese companies: देशात १७४ नोंदणीकृत चिनी कंपन्या; ३ हजारांहून अधिक कंपन्यांमध्ये चिनी संचालक

 

Back to top button