पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात एमबीबीएसच्या जागांमध्ये ८७ टक्क्यांनी तर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये १०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी आज (दि.१२) दिली.
मंडाविया म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी रालोआ सरकार व्यापक काम करीत आहे. केंद्रात आमचे सरकार सत्तेत आले त्यावेळी ३८७ वैद्यकीय महाविद्यालये होती. ही संख्या आता ६४८ वर पोहोचली आहे. या महाविद्यालयांमध्ये ३५५ वैद्यकीय महाविद्यालये सरकारी आहेत. तर २९३ महाविद्यालये खासगी आहेत. वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार देशाच्या काना-कोपऱ्यापर्यंत केला जात आहे.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत केवळ आठ वर्षाच्या कालावधीत ९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे खाजगी महाविद्यालयांच्या संख्येत ४२ टक्क्याने वाढ झालेली आहे. २०१४ साली एमबीबीएस अभ्यासक्रमासाठीच्या जागांची संख्या ५१ हजार ३४८ इतकी होती. चालू वर्षापर्यंत ही संख्या ९६ हजार ७७ वर गेली आहे. दुसरीकडे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या ३१ हजार १८५ वरुन ६३ हजार ८४२ वर गेली आहे. आगामी काळात एमबीबीएस तसेच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा आणखी वाढविल्या जाणार आहेत, असेही मंडाविया यांनी सांगितले.