भारतीय रेल्वेची २०३० पर्यंत ‘शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याची योजना | पुढारी

भारतीय रेल्वेची २०३० पर्यंत 'शून्य कार्बन उत्सर्जक' बनण्याची योजना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने ३३ टक्के कार्बन उत्सर्जन तीव्रता कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या अनुषंगाने २०३०पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जक बनण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. देशभरात समर्पित फ्रेट कॉरिडोरची स्थापना रेल्वे करीत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ३० वर्षांच्या कालावधीत जवळपास ४५७ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड (सीओ२) उत्सर्जन कमी होईल, असा अंदाज रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

देशभरातील हरितगृह वायू ‘जीएसजी’चे उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्शन दोन्हीसाठी ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ करणार आहे. ऊर्जेच्या मिश्रणात अक्षय ऊर्जेचे प्रमाण वाढण्यात येणार असल्याचे देखील मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

डिझेल इंधनात जैवइंधनाच्या ५ टक्के मिश्रणाचा वापर करण्यात येणार असून २०३० पर्यंत पाणी वापरण्याच्या कार्यक्षमतेत २० टक्क्यांपर्यंत सुधारणा करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण २०३० पर्यंत पूर्ण करून ‘नेट झिरो’ बनवण्याचे लक्ष भारतीय रेल्वेने निश्चित केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button