Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत बाद? ‘या’ नावांची चर्चा | पुढारी

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत बाद? ‘या’ नावांची चर्चा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राजस्थानमधील ताज्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस हायकमांड मोठा निर्णय घेण्याची शक्यता वाढत आहे. अशोक गेहलोत पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात, असे वृत्त आहे. सोमवारी दिल्लीतील 10 जनपथवर बैठक सुरू होण्यापूर्वीच मोठी माहिती समोर येत आहे. केरळपासून जयपूरपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकवटताना दिसत आहेत. (Congress President Election)

काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की, गहलोत आता पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर झाले आहे. ३० सप्टेंबर पुर्वी जे अर्ज भरतील तेच या शयर्तीसाठी पात्र असतील. आता या शर्यतीमध्ये मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह आणि केसी वेणुगोपाल यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. तसेच सीडब्ल्यूसी सदस्य आणि पक्षाच्या एका नेत्याने असे देखील सांगितले की, अशोक गेहलो ज्या पद्धतीने वागले आहेत ते पक्षनेतृत्त्वासाठी चांगले नाही. त्यांनी वरिष्ठ नेत्यांची डोखेदुखी वाढवून ठेवली आहे. (Congress President Election)

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक (Congress President Election)

राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल 10 जनपथवर पोहोचले आहेत. राजस्थानचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही बैठकीला हजेरी लावली आहे. राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामेश्वर दुडी हेही देखील 10 जनपथवर पोहचले आहेत. माजी खासदार कमलनाथ यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

३० सप्टेंबर रोजी सर्वच चित्र स्पष्ट होईल (Congress President Election)

काँग्रेस नेते के मुरलीधरन म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतचे चित्र ३० सप्टेंबरलाच स्पष्ट होईल. त्याच दिवशी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण-कोण लढतात हे कळेल. 29 सप्टेंबर रोजी दुपारी केरळमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होईल. सर्व नेत्यांशी चर्चा सुरू आहे. कोणताही निष्कर्ष निघाला नसून तीन दिवसांत सर्व प्रकरणे निकाली काढली जातील. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरू कुटुंबिय हस्तक्षेप करणार नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आधीच जाहीर केले आहे की ते हस्तक्षेप करणार नाहीत. राजस्थानचे प्रकरण एक-दोन दिवसांत निकाली निघेल. त्याच वेळी, शशी थरूर यांनी ही निवडणूक लढविण्याची आधीच घोषणा केली होती, परंतु तीन दिवसांत आणखी काही लोकही अर्ज दाखल करतील आणि 30 सप्टेंबरपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.

गहलोत समर्थकांचा राजीनामा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, पक्षाने अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राजस्थानमधील नवीन मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत सल्लामसलत करण्यासाठी जयपूरला पाठवले होते. पण, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच गेहलोत गटाने हायकमांडविरोधात बंड केले आणि 82 आमदारांनी सामूहिक राजीनामे दिले. नंतर हे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले. हा सर्व प्रकार पक्ष नेतृत्वाच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात पक्षाने अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हात वर करून आमदार माझ्या ताब्यात नसल्याचे सांगितले.


अधिक वाचा :

Back to top button