नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून (दि.१३) सुरुवात झाली. मोहिमेअंतर्गत देशातील कोट्यवधी लोकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकविला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या घरी सकाळी तिरंगा लावून त्याला वंदन केले. लडाखमध्ये 18 हजार 400 फूट उंचीवर इंडो तिबेटियन पोलिस दलाकडून तिरंगा लावण्यात आला. तर आसाममध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा प्रभातफेरीमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सहभाग घेतला होता.
13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. यासाठी पोस्ट कार्यालये तसेच इतर माध्यमातून तिरंगा विक्री केली जात आहे. या कालावधीत 20 कोटी घरांवर तिरंगा लावला जाईल, असा सरकारचा अंदाज आहे. मोहिमेत सामील होण्यासाठी नागरिक हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तिरंग्यासह आपल्या घराचे छायाचित्र अपलोड करु शकतात. यानंतर त्यांना हर घर तिरंगा प्रमाणपत्र दिले जाईल. उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ धाम येथे आयटीबीटीचे सैनिक तसेच भाविकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मोहिमेत सहभाग घेतला होता.
तिरंगा उघड्यावर लावायचा असेल तर तो सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत लावण्याचा नियम होता. रात्री तिरंगा लावण्यासाठी परवानगी नव्हती. मात्र स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष लक्षात घेऊन केंद्र सरकारने नियमात बदल केला आहे. नागरिक तीन दिवसांच्या कालावधीत दिवसा आणि रात्रीसुध्दा आपल्या घरावर तिरंगा लावू शकतात. घरांबरोबरच शाळा, महाविद्यालये, वाणिज्यिक आस्थापने आदी ठिकाणी नागरिक तिरंगा लावू शकतात. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा :