नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या चोवीस तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 हजार 815 ने वाढ झाली असून, 68 लोकांचा बळी गेला आहे. दुसरीकडे सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 271 ने कमी होऊन 1 लाख 19 हजार 264 वर आली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात विसाव्या क्रमांकावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या आता 4 कोटी 42 लाख 39 हजार 372 वर गेली आहे. दुसरीकडे मृतांचा एकूण आकडा 5 लाख 26 हजार 966 वर गेला आहे.
देशाची राजधानी दिल्ली आणि केरळमध्ये कोरोनाचे संकट सर्वात जास्त आहे. चोवीस तासात केरळमध्ये कोरोनाने 24 लोकांचा बळी घेतला आहे. या कालावधीत 24 लाख 43 हजार 64 कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले असून, आतापर्यंत देण्यात आलेल्या डोसचे प्रमाण 207 कोटी 71 लाख 62 हजारवर पोहोचले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या 4 कोटी 35 लाख 93 हजार 112 वर गेली आहे. गेल्या आठवडाभरात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 1 लाख 12 हजार 378 इतकी आहे. सर्वात प्रभावित भागात दिल्ली, केरळप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.