

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Bihar Political Crisis : संयुक्त जनता दलाने भाजपशी फारकत घेऊन राजदसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. यामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची राज्यसभेतली शक्तीदेखील कमी होणार आहे. सध्या वरिष्ठ सभागृहात भाजपप्रणीत रालोआ बहुमताच्या समीप आहे. पण नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याने राज्यसभेतील रालोआचे संख्याबळ घटणार आहे. महत्वाची विधेयके मंजूर करुन घेण्यासाठी त्यामुळे भाजपला अडथळ्यांचा सामना करावा लागेल.
संयुक्त जनता दलाचे राज्यसभेत एकूण पाच खासदार आहेत. यात उपसभापती हरिवंश सिंग यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम करणार्या पक्षांची संख्या तीनवर पोहोचली आहे. याआधी शिरोमणी अकाली दल आणि शिवसेनेने रालोआची साथ सोडली होती. यातील शिवसेनेचा बंडखोर गट आपण अजुनही रालोआसोबत आहोत, हे सांगत आहे, हे विशेष. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीने 2019 साली रालोआशी फारकत घेतली होती. राज्यसभेतील सध्याचे संख्याबळ 237 इतके आहे तर रिक्त जागांची संख्या 8 इतकी आहे. अशा स्थितीत सध्याचा बहुमताचा आकडा 119 इतका आहे. रिक्त जागांमध्ये जम्मू काश्मीरमधील चार, त्रिपुरातील एक आणि राष्ट्रपती निर्देशित तीन जागांचा समावेश आहे.
रालोआचे विद्यमान संख्याबळ 115 इतके आहे. यात पाच निर्देशित आणि एक अपक्षाचा समावेश आहे. संयुक्त जनता दलाने रालोआला रामराम केल्यानंतर रालोआचे संख्याबळ 110 पर्यंत खाली घसरले आहे. थोडक्यात बहुमतासाठी या सदनात रालोआकडे 9 जागा कमी आहेत. अशा स्थितीत वायएसआर काँग्रेस आणि बिजू जनता दलासारख्या कोणत्याही आघाडीत नसलेल्या पक्षांवरील भाजपची भिस्त वाढणार आहे. वरील दोन्ही पक्षांचे वरिष्ठ सभागृहात प्रत्येकी 9 सदस्य आहेत. अलिकडेच झालेल्या राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकीत वरील दोन्ही पक्षांसह शिरोमणी अकाली दल, मायावती यांचा बसपा, टीडीपी या पक्षांनी रालोआला साथ दिली होती.
दरम्यान, (Bihar Political Crisis) नितीश कुमार आजच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची आठव्यांदा शपथ घेणार असल्याचे समजते. तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.