Bihar Political Crisis : बिहारमध्ये JDU-BJP युती तुटली; नितीशकुमार म्हणाले, ‘भाजपने अपमानित केले’ | पुढारी

Bihar Political Crisis : बिहारमध्ये JDU-BJP युती तुटली; नितीशकुमार म्हणाले, ‘भाजपने अपमानित केले’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bihar Political Crisis : बिहारमध्ये भाजप-जेडीयू युती अखेर तुटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयू आमदारांच्या बैठकीत भाजपपासून वेगळे होण्याचा तसेच विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत जेडीयू यापुढे भाजपसोबत राहू शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. नितीश कुमार सायंकाळी चार वाजता राज्यपालांची भेट घेत आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यापुढ ते राजेडीचे तेजस्वी यादव यांच्यासोबत नवे सरकार स्थापन करणार आहेत असे वृत्त आहे.

बिहारमध्ये मंगळवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली. नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेण्याचा निर्णय घेत एनडीएला सोडचिठ्ठी दिली. जेडीयूच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. नितीश कुमार यांनी त्यांचा जुना मित्र पक्ष भाजपशी संबंध तोडण्याची ही दुसरी वेळ आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी 2013 मध्ये भाजपशी फारकत घेतली होती. मात्र, 2017 मध्ये त्यांनी महाआघाडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

बिहारमध्ये आता जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीसह नवीन सरकार येण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळीही मुख्यमंत्री नितीशकुमारच असतील. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होऊ शकतात. असे जाणकरांचे मत आहे. बिहारच्या राजकारणातील उलथापालथीचा परिणाम देशाच्या राजकारणावरही होणार असल्याचे बोलले जात आहे.

10 दिवसांपूर्वी म्हणजेच 31 जुलै रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बिहारमधील अनेक कार्यक्रमात सहभागी झाले होते. येथे त्यांनी एक वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, ‘भाजप विचारधारेवर आधारित पक्ष आहे. आम्ही केडर-आधारित पक्ष आहोत आणि ‘कार्यालयांची’ मोठी भूमिका आहे. भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. ही एक अशी जागा आहे जिथून कोट्यवधी कार्यकर्ते जन्माला येतात. मी वारंवार सांगतो की, ही विचारधारा नसती तर एवढी मोठी लढाई आपण लढू शकलो नसतो. सगळ्यांचा (इतर राजकीय पक्षांचा) सफाया झाला. येणा-या काळात फक्त भाजपच राहील. भाजपविरोधात लढण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक नसेल. आमची खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीशी आहे.’ नड्डा यांच्या याच वक्तव्यामुळेच भाजप-जेडीयू युतीला घरघर लागली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Back to top button