आसाममध्ये ७ ट्रक पेटवले; ५ चालकांचा जळून मृत्यू
गुवाहाटी ः आसाम मधील दीमा हसाओ जिल्ह्यातील दीयुंगबरा येथे गुरुवारी रात्री संशयित दहशतवाद्यांनी 7 ट्रक पेटवून दिले. यात 5 ट्रकचालकांचा जळून मृत्यू झाला आहे.
ट्रकना आग लावण्याआधी घटनास्थळी दहशतवाद्यांनी गोळीबारही केला. पोलिसांना घटनास्थळी 5 मृतदेह आढळून आले. गुवाहाटीपासून 200 किलोमीटरवर हे स्थान आहे. या घटनेमागे दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली आहे.
या कृत्यात सहभागी असलेल्यांना पकडण्यासाठी आसाम रायफल्सचीही मदत घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी आसाम आणि मिझोरम यांच्यातील सीमावादावरून दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात 5 पोलिसांसह सहा जणांचा मृत्यू झाला होता.