अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन : गुजरात राज्यातील बोटाद जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आज २५ झाली. ( Gujarat hooch tragedy ) ४० जणांवर उपचार सुरु असून, यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दारुबंदी असणार्या गुजरात राज्यात बनावट दारुचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणाचा तपास गुजरात दहशतवाद प्रतिबंधक दल आणि अहमदाबाद गुन्हे अन्वेषण विभाग संयुक्तपणे करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बोटाद जिल्ह्यातील रोजिद येथील रहिवाशांनी रविवारी रात्री बनावट दारु पिली हाेती. साेमवारी सकाळी त्यांना पोटदुखी आणि उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी (दि. २५) उपचारावेळी आठ जणांचा मृत्यू झाला होता. उर्वरीत 17 जणांची प्रकृती गंभीर होती. आज त्यांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. अजून ४० जणांवर उपचार सुरु असून, यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. विषारी दारूविक्रेत्याचा त्यांनी शोध सुरू केला. याप्रकरणी संशयित दारु तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट दारुमध्ये मेथनॉल मोठ्या प्रमाणावर मिसळले जात असल्याची कबुली संशयिताने दिली आहे, तपासणीत स्पष्ट झाले आहे. या केमिकलचा अहमदाबादमधून पुरवठा होत होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती गुजरातचे पोलीस महासंचालक अशिष भाटिया यांनी दिली.
विषारी दारुमुळे तब्बल २५ जणांचा मृत्यू झाल्याने पोलिस प्रशासन हादरले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआटी) नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकारीच्या नेतृत्वाखाली सुरु केली आहे. बोटाद जिल्ह्यातील रोजिंद, अनीयानी, आकरु, चंदरवा आणि उंचडी गावातील ग्रामस्थांनीही बनावट दारुचा पुरवठा झाला असल्याचे 'एसआयटी'च्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :