लोकसभा निवडणूकीचा प्रचार तापला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या विरोधी आणि सत्ताधारी पक्ष झोडत आहेत. या प्रचारामध्ये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले जात असल्याचेही आरोप एकमेकांवर केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि विरोधी पक्षाविरोधात तक्रार घेऊन भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली.
निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर भाजप नेते आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी निवडणूक आयोगाला भेट दिल्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, " आम्ही याअगोदरही काँग्रेस आणि विरोधी पक्ष वारंवार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतू काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे इतर पक्ष सातत्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत ही चिंतेची बाब आहे. म्हणून आज आम्ही पुन्हा आयोगाची भेट घेतली. आज आम्ही निवडणूक आयोगासमोर २२ उदाहरणे ठेवली, ज्यामध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पक्षाकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सातत्याने आचारसंहितेचा मान ठेवत नसल्याचे दिसत आहे."