

वाराणसी : वृत्तसंस्था
Gyanvapi controversy : न्यायालयाने नियुक्त केलेल्या सर्व्हे पथकाला सोमवारी ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग आढळले. शिवलिंग आढळलेली जागा सील करण्याचे तसेच तेथे सुरक्षा पुरविण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने जिल्हाधिकार्यांसह पोलिस आयुक्त, सीआरपीएफ कमांडंट यांना दिले. तेथे कुणालाही प्रवेश देण्यात येऊ नये. आहे त्या स्थितीत शिवलिंग सुरक्षित राहावे, असे न्यायालयाने म्हटले असून, याची जबाबदारी या अधिकार्यांवर सोपविली आहे.
काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातूनही आलेला आहे. मूळ विश्वनाथ मंदिर 1194 मध्ये मोहम्मद घोरीचा सेनापती व नंतरचा सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने उद्ध्वस्त केले होते.
सन 1230 मध्ये गुजरातेतील एका व्यापार्याने त्याची पुनर्उभारणी केली. पुन्हा 1447-1458 दरम्यान हुसैन शाह शरिकी याने व नंतर 1489-1517 दरम्यान सिकंदर लोदी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले. एका माहितीनुसार, 1585 मध्ये अकबराचा अर्थमंत्री राजा तोडरमल याने मंदिराची पुनर्उभारणी केली.
विश्वनाथाचे आजचे मंदिर हे इंदूरच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेले आहे. 1780 मध्ये अहिल्यादेवींनी काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार केला होता. 1983 पासून या मंदिराचे व्यवस्थापन उत्तर प्रदेश सरकारकडे आहे.
सन 1868 मध्ये रेव्ह. एम. ए. शेरिंग यांनी लिहिलेले 'द सॅक्रेड सिटी ऑफ हिंदू' (हिंदूंचे पवित्र शहर) या पुस्तकात, ज्ञानवापी मशिदीखाली चारही कोपर्यांत मंडपम आहेत. ज्ञान मंडपम, शृंगार मंडपम, ऐश्वर्य मंडपम आणि मुक्ती मंडपम अशी त्यांची नावे आहेत. अन्य एका परदेशी लेखकाने मंडपमचे आकारही नमूद केले आहेत. (Gyanvapi controversy)
हे ही वाचा :