दिल्लीला उष्णतेचा 'ऑरेंज अलर्ट'
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजधानी दिल्लीतील कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील नजफगढमध्ये शुक्रवारी पारा ४६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला. तर, सफदरजंग परिसरात ४२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली. सामान्यपेक्षा ३ अंश सेल्सियसने हे तापमान अधिक नोंदवण्यात आले आहे. हवामान विभागाने शनिवारी राजस्थान तसेच दिल्लीसह अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
दिल्लीतील कमाल तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. तर, किमान तापमान २८ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याचा अंदाज विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे, विभागाकडून यापूर्वी रविवारसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होत. राज्यातील बहुतांश भागात तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते.
१६ मेपासून पश्चिम विक्षोभामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यात विभागाने वर्तवली आहे. सोमवारी राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात सौम्य घट होवून ते ४१ ते ४२ अंश सेल्सियस पर्यत पोहचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचलंत का?