भोंग्यांबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये : संजय राऊत

भोंग्यांबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : "महाराष्ट्रात सरकार बनत असताना आमच्यावर पाळत ठेवली जात होती. खोटे आरोप करून फोन टॅप करण्यात आले. 'समाजविघातक' नावाखाली आमचे फोन टॅप केले. आता भोंग्यांचा वाद भाजपाने सुरू केला आहे. गुजरात, उत्तर प्रदेशमधील भोंगे हटविले का? भोंग्यांबाबत मोदी सरकारने राष्ट्रीय धोरण बनवलं पाहिजे. भोंग्यांच्या नावाखाली राजकीय ढोंग सुरू आहे. भोंग्यांमुळे हिंदुत्व बदनाम होत आहे", असे मत संजय राऊत यांनी आज व्यक्त केले.

आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला

"नाना पटोले, खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचं खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले होते. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना आमच्यावर नजर ठेवत नव्या सरकारसंबंधी माहिती घेतली जात होती. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून तुम्ही निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा ठेवता, ती एका राजकीय पक्ष, नेत्यासंबंधी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत होती. आता रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे", असे मत संजय राऊत यांनी मांडले.

केंद्राने पहिल्यांदा भोंग्यांसंदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करावं

"आता जे काही हिंदुत्वाच्या नावावर राजकीय भोंगे वाजत आहेत. ढोंग सुरु आहे हे ज्याप्रकारे सुरु आहे ते पाहता केंद्राने भोंग्यांसंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. आतापर्यंत गुजरातमधील लाऊडस्पीकर काढण्यात आलेले नाहीत. ज्याप्रकारे गोवंश हत्यासंबंधी एक धोरण तयार केलं, पण काही राज्यांना तुम्ही सूट दिली. गोव्यासारख्या काही राज्यांनी तुमचं धोरण स्वीकारण्यास नकार दिला. मग काय झालं त्या राष्ट्रीय धोरणाचं? पण मी पक्षाच्या वतीने पंतप्रधानांना आवाहन करतो की, तुमच्या लोकांनी आणि त्यांच्या इशाऱ्यावर जो लाऊडस्पीकरचा वाद उभा केला आहे, त्यावर राष्ट्रीय धोरण करा आणि सर्वात आधी बिहारमध्ये नंतर दिल्ली, गुजरातमध्ये लागू करा. महाराष्ट्र तर कायद्याचं पालन करणारं राज्य आहे. हिंमत असेल तर धोरण करा आणि सक्तीने त्यांची अंमलबजावणी करा", असाही सल्ला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.

राजकीय भोंग्यांच्या वादामुळे हिंदुत्व बदनाम

"सध्या जो काही राजकीय भोंग्याचा वाद सुरु आहे त्यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. हिंदुत्वाविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. मशिदी, मंदिरं, सभा किंवा राजकीय सर्व भोंग्यासंबंधी धोरण निश्चित करत कायदा करा. भाजपाला आता जाग आली आहे. त्यांना आता त्यांची झोप उडाली आहे. बाळासाहेबांची मशिदींवरील भोंग्याची भूमिका सर्वांना माहिती आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात कारवाया सुरू आहेत. आम्हाला कोणाकडून अक्कल शिकण्याची गरज नाही," असंही त्यांनी भाजपाला सुनावलं आहे.

न्यायालयाचा दुजाभाव हाच एक प्रकारचा घोटाळाच

"फक्त भोंगे लावून गोंगाट करुन चालत नाही. राज्यकर्त्याला तोडगा काढावा लागतो आणि ती हिंमत तेव्हा शिवसेना आणि बाळासाहेबांमध्ये होती. हिंदूह्रदयसम्राट म्हणून बाळासाहेब स्वत:चे निर्णय स्वत: घेत होते. त्यांच्यावर कोणी निर्णय लादत नव्हतं. न्यायलयं एकाच पक्षातील नेत्यांना दिलासा देत आहेत हा न्यायव्यवस्थेतील घोटाळाच आहे. मी माझ्या मताशी ठाम आहे", असंही यावेळी ते म्हणाले.

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news