![नेत्यांनी मतभेद विसरुन पक्षाला भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावेत : सोनिया गांधी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F04%2Fsoniya-gandi.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (दि. ५) संसद भवनमध्ये काँग्रेस संसदीय दलाच्या ( सीपीपी ) बैठकीला संबोधित केले. नेत्यांनी मतभेद विसरुन पक्षाला भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करत लोकशाही व्यवस्थेसाठी देशाला काँग्रेस पक्षाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी सोनिया गांधी म्हणाल्या, आज भाजप देशातील इतिहासची मोडतोड करुन सादर करत आहे. सत्ताधारी पक्ष देशात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. मात्र आम्ही त्यांना कधीच यशस्वी होवू देणार नाही. याविरोधात रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल. सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्षांना तपास यंत्रणेच्या माध्यमातून धमकी देत आहे. मात्र अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही आणि गप्पही बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आज जीवनावश्यक वस्तूंचे दरांचा भडका उडाला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी महागाईच्या प्रश्नावर आवाज उठवणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करत पक्षामध्ये एकमत असणे आवश्यक आहे. यासाठी मी आवश्यक पावले उचलण्यास तयार आहे. तुमच्याकडून आलेल्या सूचनावर काम सुरु आहे. आज काँग्रेस पक्षाचे पुन्नरुजीवन हे पक्षासह देशाच्या लोकशाही आणि समाजसाठी आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाकडून शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. शिबिरांच्या माध्यमातून जनेतशी संवाद साधता येईल.यातूनच पक्षाची पुढील वाटचालही निश्चित करण्यास मदत होणार असल्याचेही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.
पुढील काळ हा अधिक आव्हानात्मक असणार आहे. आपल्या सर्वांचे समर्पण आणि कटिबद्धता याच्या परीक्षेचा काळ असेल. पक्षात एकजुट आवश्यक आहे. पक्षातील ऐक्य अबाधित राहावे यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यास वचनबद्ध आहे, असेही साेनिया गांधी यांनी सांगितले. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आदी उपस्थित होते.
हेही वाचा: