पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपूर्वी भाजपने चार राज्यात सत्ता स्थापन केली. काँग्रेसला पराभूत करत पुन्हा सत्तेवर आलेले आमदार हे मुळचे भाजपचे आहेत की ते दुसऱ्या पक्षातून येत भाजपमध्ये आमदार झाले याची आपल्याला माहिती आहे का ? गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या लढतीत कित्येक भाजपचे आमदार हे काँग्रेसवासी होते. (congress vs bjp)
४० विधानसभेच्या जागांसह देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यात भाजपने यावेळी २० जागा जिंकल्या, परंतू २० पैकी १२ आमदार आयात केलेले आहेत. म्हणजे इतर पक्षांतून भाजपमध्ये येऊन विजयी झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ८ आमदार काँग्रेसचे आहेत. त्याच जोरावर भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे.
गोव्याप्रमाणेच ६० जागांच्या मणिपुरमध्येही भाजपने ३२ जागा जिंकल्या. यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेले ८ आमदार भाजपमध्ये जात निवडूण आले आहेत. मणिपूरमध्ये जिन एन बिरेन सिंह यांना भाजपने पुन्हा मुख्यमंत्री बनवले आहे, ते २००४ ते २०१६ पर्यंत म्हणजेच १२ वर्षे काँग्रेसमध्ये होते. २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हाेता.
गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या १० आमदारांपैकी ३ आमदार यावेळी पुन्हा निवडून आले आहेत. काँग्रेसने २०१७ मध्ये गोव्यात १७ जागा जिंकल्या होत्या; परंतु निवडणुकीपूर्वी त्यांचे फक्त दोन आमदार पक्षाकडे राहिले होते. यातील बहुतांश जण भाजपमध्ये दाखल झाले.
केवळ मणिपूर, गोव्यातच नाही तर उत्तराखंडमध्येही भाजपने काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला . सुबोध उनियाल, रेखा आर्य, सतपाल महाराज, उमेश शर्मा कौ, सौरभ बहुगुणा यांसारखे नेते २०१७ मध्येच भाजपमध्ये दाखल झाले होते. तर सरिता आर्य आणि किशोर उपाध्याय यांनी २०२२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील काँग्रेसच्या दिग्गज नेत्या अखिलेश सिंह यांची कन्या अदिती सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला. २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर रायबरेलीची त्यांनी जागा जिंकली.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ पंत म्हणतात की, काही लोक राजकारणाला व्यवसाय म्हणून पाहतात. कंपन्या बदलतात तसे पक्ष बदलतात. अशा लोकांची वैचारिक बांधिलकी नसते.
दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी २२ आमदारांसह पक्ष सोडला आणि काँग्रेसचे सरकार पाडले. तेव्हापासून मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. यूपी निवडणुकीपूर्वी आरपीएन सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आसाममध्ये २०१४ मध्ये हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडली. २०२१ मध्ये विजयानंतर भाजपने त्यांना मुख्यमंत्री केले. काँग्रेसमध्ये असतानाही ते मुख्यमंत्री होण्याची मागणी करत होते, मात्र पक्षाने त्यांची मागणी धुडकावून लावली होती.