पीयूष गोयल, "भारतीय व्यापारी मालाची निर्यात ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणार!"
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय व्यापारी निर्यात १४ मार्चपर्यंत जवळपास ३९० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली असून चालू आर्थिक वर्षात ही निर्यात ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल, असा दावा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.
नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्सरर्स असोसिएशन (एसीएमए) आणि आत्मनिर्भर उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “भारतातील वाहनांच्या सुट्या भागांच्या उद्योगाने पहिल्यांदाच ६०० दशलक्ष डॉलर्सहून अधिकचा व्यापार केला आहे. तर, स्वयंचलित वाहन उद्योग १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये ८ टक्के वाटा या उद्योगांचा असून देशाच्या जीडीपीत २.३ टक्के वाटा आहे. २०२५ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग बनणार आहे.”
स्वयंचलित वाहन उद्योग क्षेत्राशी संबंधित ‘चिप’च्या तुटवड्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. ७६,००० कोटींची तरतूद करीत ‘सेमिकॉन इंडिया’ हा उपक्रम आयात अवलंबित्व कमी करण्यात मदत करीत चिपच्या क्षेत्रातही देशाला आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल. वाहन उत्पादकांनी भारतीय बनावटीच्या घटकांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन यानिमित्ताने गोयल यांनी केले.
हे वाचलंत का?