

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप लक्षात घेता मार्च महिन्यापासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Child vaccination) सुरू करण्यासंबंधी केंद्र सरकार विचार करीत आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
३ जानेवारीपासून १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Child vaccination)सुरू करण्यात आले आहे. नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनाइझेशन (एनटीएजीआय) प्रमुख डॉ.एन.के.अरोड़ा यांनी सांगितले की, देशात १५ ते १७ या वयोगटातील सुमारे ३.३१ कोटी मुलांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. केवळ १३ दिवसात ४५% मुलांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. जानेवारी अखेरपर्यंत १५ ते १७ या वयोगटातील सुमारे ७.४ कोटी मुलांना लसीचा पहिला दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फेब्रुवारी महिन्यात मुलांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत दोन्ही डोस मुलांना दिले जातील. त्यानंतरच १२ ते १४ या वयोगटातील मुलांनी फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये कोरोनाची लस देण्यात सूरुवात होऊ शकते, असे सूचक वक्तव्य अरोडा यांनी केले. १२ ते १७ या वयोगटातील मुले देखील मोठ्या प्रमाणात वयस्कर प्रमाणेच असतात. त्यामुळे सरकार या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य देत आहे. कारण किशोरवयीन मुले शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा अन्य ठिकाणी फिरतात. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे या मुलांना लवकरात-लवकर लस देणे खूप आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :