

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून, येत्या डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो-३ टप्प्याच्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी मार्गाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी भुयारी मार्गातून चालत प्रकल्पाची पाहणी केली आणि कामाची संपूर्ण माहिती घेतली. मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे- सिप्झ ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २,६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. या शिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्या शिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे. या मेट्रो -3 रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील असा विश्वास व्यक्त करून या मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मेट्रो ३ प्रकल्प : एक दृष्टिक्षेप
– कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे
– या मार्गावर २७ स्थानके. त्यापैकी २६ भुयारी तर एक जमिनीवर आहे.
– मेट्रो-३ च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत असतील.
– उपनगरीय रेल्वेतील १५% प्रवासी मेट्रो-३ कडे वळतील.
– सन २०४१ पर्यंत मेट्रो-३ मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन ६.६५
लाखाने घट होईल.
– या मार्गामुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन
कमी होईल.
मेट्रो-३ च्या तीन गाड्या दाखल
आतापर्यंत मेट्रो-३ च्या तीन गाड्या मुंबईत दाखल; अजून दोन गाड्या श्रीसीटी आंध्र प्रदेश येथील ऑस्तोम कारखान्यातून मुंबईकरिता रवाना झाल्या असून, १७ किंवा १८ मेपर्यंत या गाड्या मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. यानंतर उर्वरित ४ गाड्या प्रत्येक महिन्यात २ अशा मुंबईत दाखल होतील.
हेही वाचा :