

यवतमाळ : शहरातील गुन्हेगारीला पुन्हा एकदा वाव मिळाल्याचे धक्कादायक घटना उघड झाली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी भरदिवसा झालेल्या मनिष शेंद्रेच्या हत्येची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी रात्री आणखी एका युवकाचा भररस्त्यात खून करण्यात आला. संकटमोचन रोडवर तिघांनी मिळून धारदार शस्त्राने वार करून सूरज कानबा गाताडे (रा. उमरसरा) याची निर्घृण हत्या केली.
सूरज गाताडे आणि त्याचा मित्र ऋषी लामकासे हे दोघेही नगरपालिकेच्या घंटागाडीत कचरा संकलनाचे काम करायचे. या कामादरम्यान तांब्याचे तारे आणि भंगार गोळा करून ते त्यातून थोडेफार पैसे मिळवत असत. आरोपी गट्टू भोयर आणि दोन अल्पवयीन मुलं हे तिघेही त्यांचे ओळखीचे होते. तीन महिन्यांपूर्वी सूरजने या अल्पवयीन मित्रांना तांब्याची तार जाळून देण्यास सांगितले होते. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून त्यांच्यात दुश्मनी निर्माण झाली होती.
शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता सूरज आणि ऋषी हे दुचाकीवरून नवीन उमरसरा परिसरात जात असताना, जगत मंदिर रोडवर गट्टू भोयर आणि दोन अल्पवयीनांनी त्यांची वाट अडवली. वादावादीतून चाकूहल्ला झाला. सूरजचा मित्र ऋषीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सूरज गाताडे धावत पळून गेला, मात्र आरोपींनी पाठलाग करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला.
हल्ल्यानंतर आरोपींनी वापरलेला चाकू जवळील नाल्यात फेकून दिला. नागरिकांनी सूरजला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गट्टू भोयर तसेच दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. तिघेही उमरसरा परिसरातील असल्याची माहिती आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी ही चिंता वाढवणारी बाब ठरत आहे.