

यवतमाळ : अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना सोमवारी आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथे घडली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे स्मशानभूमीत उपस्थित नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या हल्ल्यात गणेश आत्राम, विनोद कुंडकर, कृष्ण रोडगे, दत्ता बनसोड, शिवदास तिरपुडे, देवानंद साखरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजनखेड येथील शिक्षक गणेश भागवत यांच्या आईचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते. यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, विधीसाठी लागणारा विस्तव पेटवण्यात आला. या विस्तवाच्या धुरामुळे स्मशानभूमी परिसरातील कडुलिंबाच्या झाडावर असलेली मधमाशांची तीन पोळी अचानक विचलित झाली आणि मधमाशांनी उपस्थित नागरिकांवर हल्ला चढवला.
हा हल्ला इतका भीषण होता की, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांना तिरडी जमिनीवरच ठेवून सैरावैरा पळावे लागले. या गोंधळामुळे अंत्यविधी काही काळासाठी खोळंबला होता. प्राथमिक उपचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.