

Yavatmal Rain Damage
यवतमाळ : मागील अवघ्या 24 तासांत कोसळलेल्या 135 मिमी मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजविला. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 98 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे 518 घरांचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.
प्रशासनाने आतापर्यंत 25 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. पुराच्या पाण्यामुळे सहा गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, जिल्ह्यातील 13 प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी शेतकर्यांचे सिंचन साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले असून, पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. पुराच्या तडाख्यात जनावरांनाही मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत 97 शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक ग्रामस्थ बचाव व मदतकार्यात गुंतलेले असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
हवामान विभागाने आणखी पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून किंवा रस्त्यांवरून प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पूरग्रस्तांना तातडीची मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.