

यवतमाळ : जुन्या वादातून एका दिव्यांग युवकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना जिल्ह्यातील दोनोडा (ता. कळंब) येथे मंगळवारी (दि. २४) सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, बाप आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मृत दत्ता उर्फ अविनाश केशव चौधरी (वय ३३) आणि आरोपी आशिष मारोती करलुके (वय ३३) यांच्यात वर्ष २०२० मध्ये वाद झाला होता. त्यावेळी आशिषने केलेल्या हल्ल्यात दत्ता गंभीर जखमी झाला होता आणि त्याला कायमचे दिव्यांगत्व आले होते. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता.
संशयीत आरोपी आशिष हा सध्या वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे एका कंपनीत काम करत असून तो पोलीस भरतीची तयारी करत होता. अंगावर फौजदारी खटला असल्याने त्याच्या नोकरीत अडथळा येत होता. त्यामुळे तो वारंवार दत्ताला खटला मागे घेण्याची विनंती करत होता. मात्र, ज्या हल्ल्यामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले, तो खटला मागे घेण्यास दत्ताने ठाम नकार दिला.
सोमवारी (दि. २३) रात्री आरोपीचा बाप मारोती करलुके (वय ५५) आणि दत्ता यांच्यात पुन्हा वाद झाला. मारोतीने तातडीने मुलगा आशिषला बोलावून घेतले. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दत्ता एका पानठेल्याजवळ उभा असताना, बाप-लेकाने संगनमत करून त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या भीषण हल्ल्यात दत्ताचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मृत दत्ताचे वडील केशव चौधरी यांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिस अधिकारी राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.