

उमरखेड : मराठी साहित्याचा वैश्विक जागर घडविणाऱ्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अकरावे पर्व लेह-लडाख येथे २४ ते २९ ऑगस्टदरम्यान रंगणार आहे. मराठी भाषेचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने शब्द परिवाराच्या वतीने सातत्याने विविध देशांत साहित्य संमेलने आयोजित केली जात आहेत. यापूर्वी थायलंड, दुबई, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर आणि भूतान येथे संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत.
या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरच्या ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने, उद्घाटक म्हणून पुण्याच्या संगीता धायगुडे, तर सभारंभाच्या अध्यक्षपदी दिल्लीचे मनीष गवई यांची उपस्थिती राहणार आहे. देशभरातील साहित्यिक, कवी, लेखक, प्रबोधनकार आणि साहित्यप्रेमी या संमेलनात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे तीघे या संमेलनात सहभागी होणार आहेत. मुळावा येथील मिलिंद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख, प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. अनिल काळबांडे, समाजसेवी डॉ. अजय नरवाडे आणि ज्येष्ठ छायाचित्रकार रमेश भागवत यांचा सहभाग राहणार आहे.
संमेलनातील विविध परिसंवाद, कवी संमेलन आणि उद्घाटन सोहळ्यात डॉ. अनिल काळबांडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. याच संमेलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. काळबांडे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
अनुदानाविना माय मराठीचा जागर!
शब्दचे प्रमुख संजय सिंगलवार आणि उपाध्यक्ष शशी डंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अकरा वर्षांपासून हे साहित्य संमेलन सातत्याने आयोजित केले जात आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता सहभागी साहित्यिकांच्या सहकार्याने विविध देशांत मराठी साहित्याचा आणि माय मराठीचा जागर घडवून आणला जात आहे. लेह-लडाखसारख्या दुर्गम आणि निसर्गरम्य भूमीत होणारे यंदाचे संमेलन मराठी साहित्याच्या वैश्विक वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.