चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : साहित्य आनंद देणारे, चिंतन करायला लावणारे, समाज जोडणारे, पीडितांची शुश्रूषा करणारे आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारे असावे. पुस्तक वाचणाऱ्यांची आणि त्यातही विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. पण साहित्यिकांनी खचून न जाता नव्या आयुधांचा वापर करून सकस साहित्य युवा पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपुरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचे वातावरण उष्ण आहे. मात्र, जे सुलाखून निघते तेच सोने असते. या संमेलनातील चिंतनातून निघणारे विचारही सोन्यासारखेच असतील. वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी नियंत्रण मंडळ आहे. पण मानसिक प्रदूषण कोण राखेल, तर त्यासाठी साहित्य आहे. विदर्भ या देशाच्या हृदयस्थानी आहे. आणि म्हणून चांगले व उन्नत विचार प्रसृत करण्याची जबाबदारीही विदर्भ साहित्य संघाची आहे. साहित्याच्या या पालखीला खांदा देण्यासाठी चंद्रपूरकर सदैव तत्पर आहेत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि. स. जोग हे होते. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, प्र.-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आ. अभिजीत वंजारी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, संमेलनाचे संरक्षक तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. ए. काटकर, संमेलनाचे कार्यवाह इरफान शेख कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र शोभणे, संजय वैद्य, सरचिटणीस विलास मानेकर, सत्कारमूर्ती डॉ. शरद सालफळे, बंडू धोतरे, डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?