

Banana Farming Expansion
वर्धा : केळी पिकासाठी दर्जेदार रोपे आणि ठिंबक सिंचनाचा वापर करुन चांगले नियोजन केल्यास अधिक उत्पादन होऊ शकते. केळी पिकाचे हवामान, मध्यम आर्दता आणि जोरदार वाऱ्यापासून संरक्षण होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात केळी क्षेत्रवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे मत विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे यांनी व्यक्त केले.
जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालय व आत्माच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील केळी मुल्यसाखळी विकास व केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी परिषद व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषि विद्यापिठाचे सहाय्यक प्राद्यापक राजेंद्र वानखेडे, कृषि पणन तज्ञ दिलीप पायदेकर, आरोग्य तज्ञ डॉ.स्वप्नील तळवेकर, जिल्हा केळी उत्पादक संघाचे डॉ.निखील ताल्हन, डॉ.विवेक चाकोले, स्वरुपा इंडस्ट्रीजच्या संचालक स्वरुपा चाकोले, वनस्पती संरक्षक अधिकारी संजय वाघ, केळी रत्न पुरस्कारार्थी कुंदन वाघमारे, निर्यातदार दिपक शिंदे, हिमांशू शिंदे, महेश डुबे, राहूल वांदिले, बाजार समिती वर्धाचे सचिव समीर पेडके उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र वानखेडे यांनी केळी लागवडीसाठी रोगमुक्त 30 ते 45 सेमी उंचीची रोपे निवडून दोन रोपातील अंतर 1.8X1.5 मीटर किंवा 1.8 X1.8 मीटर याप्रमाणे एका हेक्टरमध्ये साधारण 3 ते 3 हजार 700 रोपाची लागवड करावी. आवश्यकतेनुसार शेतखताचा वापर करावा, असे सांगितले. दिलीप पायदेकर यांनी पणन महामंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कुंदण वाघमारे यांनी केळीला बाजारातील मागणी व विविध भागातील केळी पिंकांचे बाजारभाव यावर माहिती दिली. डॉ. स्वप्नील तळवेकर यांनी लहान मुलांना आहारात केळी फळाचे महत्व याविषयावर माहिती दिली.
अरविंद उपरीकर यांनी रिपनिंग चेंबर, प्रक्रिया उद्योग व निर्यांत व्यवस्था, केळी मुल्यसाखळीमध्ये प्रक्रिया, पॅकींग, रिपनिंग आणि निर्यात व्यवस्थापनाचे महत्व, केळीपासून विविध उत्पादने बनवून मार्केट लिंकेज करणे, मुल्यसंवर्धनाची संधी व प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कृषि विभागाच्या विविध योजनांची सांगड घालून प्रक्रिया उद्योग निर्मितीकडे पाऊल टाकणे योग्य असल्याचे सांगितले.
यावेळी निकेश इंगोले, स्वरुपा चाकोले, डॉ.निखिल ताल्हन यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद उपरिकर यांनी तर आभार रोहन झांजरे यांनी मानले. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, केळी उत्पादक संघाचे प्रतिनिधी, केळी उत्पादक शेतकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते