

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : तेंदूपुड्यांना दर शेकडा अकराशे रुपये भाव द्यावा, अशी तंबी देत नक्षल्यांनी बुधवारी रात्री धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील तीन गावांतील नागरिकांनी गोळा केलेल्या तेंदू पानांची जाळपोळ केली. यामुळे नागरिक व तेंदू कंत्राटदारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
रिधवाही, उमरपाल आणि केहकावाही या तीन गावाबाहेर तेंदू फळीवर नक्षलवादी गेले. त्यांनी फळीवर संकलित केलेले हजारो तेंदू पानांच्या पुड्यांची जाळपोळ केली. या तेंदू फळी चंद्रपूरच्या एका कंत्राटदाराच्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. यामाध्यमातून जंगल व्याप्त भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यातून त्यांचे वर्षभराचे अर्थचक्र चालते. यातून नक्षल्यांना देखील मोठ्या प्रमाणात खंडणी मिळत असते. मात्र, मागील वर्षी कमी भाव मिळाल्याने यंदा अनेक ठिकाणी तेंदू पानाची मजुरी घसरली आहे. तर काही ठिकाणी कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षल्यांना रसद मिळणे कठीण होऊन बसले आहे.
परिणामी खवळलेल्या नक्षल्यांनी मागील दहा दिवसांपासून छत्तीसडमध्ये तेंदू फळींची जाळपोळ सुरू केली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास मुरूमगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील छत्तीसगड सीमेवरील रिधवाही, उमरपाल आणि केहकावाही गावात जवपास वीस फळींची जाळपोळ करण्यात आली. याठिकाणी एक पत्रक देखील आढळून आले आहे. उत्तर गडचिरोली डिव्हीजन कमिटी भाकपा (माओवादी) नावाने असेलल्या या पत्रकात तेंदू पानांना अकराशे रुपये प्रती शेकडा भाव द्या अशी धमकी देण्यात आली आली आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, हे कृत्य नक्षल्यांनी केले की अन्य कुणी याबाबत तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.
-हेही वाचा