नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे व भाजप नेते मुन्ना यादव यांची गुंडगीरी दिवसेंदिवस वाढतच आहे. पोलिस स्टेशनमध्ये मुन्ना यादव व त्यांचे सहकारी वरीष्ठ पोलिसांच्या अंगावर धावून जातात, त्यांना धमक्या दिल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. मुन्ना व त्याचे सहकारी मारहाण करतात, त्यात ४ जण गंभीर जखमी होवूनही त्या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. मुन्ना यादव व त्याच्या सहकाऱ्यांना पोलिस कोणाच्या दबावाखाली अभय देत आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
मुन्ना यादव यांच्या विरुध्द नागपूर शहरात अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना पोलिसांकडुन त्याला नेहमीच अभय देण्यात येत आहे. मुन्ना यादव याची नागपूर शहरात इतकी दशहत आहे की, त्याच्या विरुध्द कोणी तक्रार देण्यास पुढे येत नाही. २०१४ ते २०१९ पर्यत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असतांना त्याच्या विरुध्द गंभीर गुन्हाचे आरोप होते. तरी सुध्दा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्षपद दिले. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा दुरूपयोग करुन गुडांना अभय देत आहे काय ? असा प्रश्न सुध्दा अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.
चुनाभट्टी परिसरात शनिवारी (दि.5) रात्री मुन्ना यादव व त्याच्या गुडांनी काही जणांना मारहाण केली. यात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नागपूरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्याच्या विरुध्द कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मारहाणीनंतर मुन्ना यादव व त्याच्या सहकाऱ्यानी पोलिस स्टेशनला येवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी देवून पोलिसांच्या अंगावर हात सुध्दा उगारला तसेच बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणात त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी चुनाभट्टी येथील गँगवार प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या दोन्ही प्रकरणात मुन्ना यादव याच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी यानिमित्ताने केली आहे. फडणवीस हे मुन्नाला अभय देत असल्याचे नागपूर पोलिस विभागात नाराजीचा सुरु असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले.