कोल्हापूर : सुनील सकटे
महावितरणची घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांकडे थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. थकबाकी वसुली महावितरणची डोकेदुखी बनली आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
याचाच भाग म्हणून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी अभय योजना सुरू केली. ग्राहकांनी शंभर टक्के मूळ थकबाकी भरल्यास व्याजासह दंड माफ केला जाणार आहे.
थकबाकी व कंसात ग्राहक संख्या :
कोल्हापूर ४० कोटी २ लाख (२,४०,८१५), सांगली ४८ कोटी ८७ लाख (२,५८,१५०) सातारा- ४० कोटी ३८ लाख (२,४०,७०). थकबाकी असल्याने हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. अनेकांचा कायमस्वरूपी, तर काही ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित केला आहे.
या परिपत्रकानुसार ३१ मार्च २०२४ किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला असावा, तर ३१ मार्च २०२४ पर्यंतची थकबाकी ग्राह्य धरण्यात येणार आहे. एक सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत योजना लागू राहील.
या योजनेत संपूर्ण मूळ थकबाकी भरल्यास व्याज व दंडाची रक्कम माफ केली जाणार आहे. थकबाकीची रक्कम शंभर टक्के एकरकमी भरण्यावरोबरच ३० टक्के रक्कम एकरकमी भरून उर्वरित रक्कम सहा हप्त्यांत भरण्याची सवलत देण्यात येणार आहे. उच्च दाब ग्राहकांनी थकबाकी एकरकमी भरल्यास त्यांना पाच टक्के तर लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत मिळेल.