

Vijay Wadettiwar on Election Commission
नागपूर: निवडणूक आणि मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता असावी. निवडणूक आयोग या बाबतीत सरकारचा भागीदार झाल्याप्रमाणे वागत आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. आमच्या शिष्टमंडळाने आयोगाला विचारले असता त्यांच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हते. एका घरात चारशे लोक कसे दाखवले जाऊ शकतात? हा घोटाळा कोणाच्या इशाऱ्यावर केला गेला? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
मतदार यादीतील गडबड ही स्पष्टपणे फसवणूक आहे. बोगस मतदार तयार करून निवडणूक जिंकण्याचा हा नवीन फंडा आहे, असा दावा करून आज आम्ही मोर्चाद्वारे निवडणूक आयोगाला इशारा देत आहोत. ही बाब स्वच्छ केली नाही आणि तुम्ही भाजपचे सहकारी पक्ष म्हणून काम करत असाल तर देशातील लोकशाही आणि उद्याचे भविष्य धोक्यात येईल. अन्यथा त्यांना जागेवर आणण्याचा इशारा देणारा हा मोर्चा असल्याची सूचना दिली.
कुणाचे नेतृत्व कुणाचे झेंडे हा प्रश्न नाही. आम्ही मोर्चात सहभागी झालो आहोत. मी विधानसभेतील पक्षनेता म्हणून मोर्चात चाललो आहे, असे स्पष्ट केले. बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्रातील अनेक नेतेही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतचोरी झाली आहे आणि मतचोरी करून सत्ता मिळवली गेलीय, हे आता समोर आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज राज ठाकरेपासून ते राहुल गांधीपर्यंत सर्वांना हा मुद्दा पटला आहे.
अजित पवारांविषयी बोलताना शेतकरी संकटात असताना खरेतर संवेदनशील भाषण करायला हवे; पण अजित पवारांनी ‘निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली’ असे वक्तव्य केले आहे. ही शेतकऱ्यांशी बेईमानी आहे. याचा बदला निवडणुकीत दिला जाईल. लोक या धोरणाची दखल घेवून योग्य निर्णय करतील.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान नेहरूंवर केलेल्या टीकेबाबत छेडले असता अब हाथ में कुछ नहीं तो नेहरू दिखते हैं; जब कुछ खुद से करना नहीं आता तो नेहरू ही दिखते हैं, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
पंतप्रधान काय करत आहेत? शेजारील देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले नाहीत. चीनसोबत मैत्रीचा दावा करुन त्यांनी सैन्यबळ उभे केल्याचा आरोपही केला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात १३ वर्षे तुरुंगात गेलेल्यावर टीका करण्याचा अधिकार पंतप्रधानांकडे आहे का?, हे बघून नंतर बोलावं,असेही ते म्हणाले.
हे सारे निवडणुकीत लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. जनता अशा धंद्यात फसणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलताना हे खरं आहे की काही संघटना नोंदणीकृत नाहीत. नोंदणी नसलेली संघटना पैसे कशी वापरते, कुठे ठेवते हे स्पष्ट नाही. ज्यांची नोंदणी नाही, त्या संघटनांद्वारे समाजावर व धर्मावर परिणाम होण्याची शक्यता आहे, हा गंभीर प्रश्न आहे, असा आरोप त्यांनी केला.