

नागपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर भ्याड हल्ला, अनेकांचा मृत्यू ही घटना समाज मनाला सुन्न करणारी आहे, मात्र या घटनेचे काही लोक राजकारण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांनी सरकारच्या आणि या हल्ल्यात ज्यांचे जीव गेले त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
या हल्ल्याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. मृतकामध्ये सहा लोक महाराष्ट्रातील असून अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील पर्यटकाशी मी संपर्कात आहे. सरकार त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी व्यवस्था करत आहे. या पर्यटकांना धर्म विचारून, हिंदुना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले अशा पद्धतीची घटना दुर्दैवी आहे.
जम्मू काश्मीर येथे गेल्या काही दिवसात पर्यटकांची संख्या वाढत होती. ३७० कलम हटवल्यानंतर वातावरण ज्या पद्धतीने बदलत गेले त्याला दहशतवाद्यांकडून गालबोट लावण्याचे काम करण्यात आले यावर भर दिला.