

Vidarbha Sahitya Sangh Election
नागपूर: राजकारण्यांनी, व्यावसायिकांनी किंवा साहित्य क्षेत्राच्या बाहेरील मंडळींनी कधीही साहित्य संस्थांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे मी नेहमी म्हणत असतो. त्यामुळे मी विदर्भ साहित्य संघात, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केल्याने साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यासोबतच ही निवडणूक अविरोध व्हावी, सर्वानुमते सर्वसमावेशक कार्यकारिणी व्हावी यावर त्यांनी भर दिला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले असून यात नितीन गडकरी यांच्या नावाचा संदर्भ जोडला गेल्याने निवडणूक चर्चेत आली आहे. डॉ. श्रीपाद जोशी यांनी गडकरी यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले. आता गडकरी यांनीच यात स्पष्टता आणली आहे.
गडकरी म्हणाले, विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा हस्तक्षेप असल्याच्या किंवा सहभाग असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. त्यात तथ्य नाही. उलट मी विदर्भ साहित्य संघाचा हितचिंतक आहे. शंभर वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या या संस्थेच्या कल्याणाचाच विचार मी करीत आलो आहे. आजची वर्तमान वास्तू पाडून त्याठिकाणी साहित्यिक व नाट्य चळवळीसाठी सोयीची अशी उत्कृष्ट वास्तू उभी व्हावी, असे माझे व्यक्तिगत मत आहे आणि ते यापूर्वी देखील होते.
याठिकाणी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील उपक्रमच आयोजित व्हावे. नवसाहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे आणि जुन्या जाणत्यांचा सन्मान व्हावा, हाच माझा विचार आहे आणि एवढीच माझी या संस्थेच्या संदर्भात अपेक्षा आहे. विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची व कार्यकारीणीची निवडणूक ही त्या संस्थेशी संबंधित एक प्रक्रिया आहे. आजपर्यंत या निवडणुकीशी कधीही माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नव्हता आणि आजही नाही.
त्यामध्ये माझा सहभाग असण्याचेही काहीच कारण नाही. उलट निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी ज्या मंडळींनी उमेदवारी दाखल केली आहे अश्या सर्वच प्रकारच्या परस्पर विरोधी व्यक्तींसोबत माझे उत्तम व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांनी एकत्र बसून, निवडणूक न होऊ देता, सर्वानुमते अध्यक्ष निवडण्याचा प्रयत्न करावा. विदर्भाच्या साहित्य क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी पोषक ठरेल, असे वातावरण तयार करू शकणारी कार्यकारीणीही सर्वानुमतेच निवडावी, असे मला मनापासून वाटते. विदर्भ साहित्य संघाच्या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने ही एक आदर्श बाब ठरेल या शब्दात त्यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.