

मुंबई : आयआयटीतील विद्यार्थी आणि संशोधन उपक्रमांचे योगदान देशाच्या विकासात अमूल्य असून देशाच्या प्रगतीसाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि तरुण बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
आयआयटी मुंबई येथे आयोजित टेकफेस्ट 2025 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयआयटी मुंबईचे अध्यक्ष प्रा. शिरीष केदार, माजी अध्यक्ष डॉ. शरद सराफ, प्रा. सूर्यनारायण हुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी थेट आयआयटींशी शेअर केल्या जातात. आयआयटींकडून मिळणाऱ्या उपाययोजनांना देशभरात मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळते. ही बाब आयआयटीच्या विश्वासार्हतेचे द्योतक असून आयआयटी म्हणजे भारताची ‘ज्ञानभांडार’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संशोधनातून प्रत्यक्ष वापरात येणारी उत्तरे देण्याची आयआयटींची क्षमता हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या भविष्यासाठी संसाधने, ज्ञान आणि तंत्रज्ञान या तिन्ही घटकांचे महत्त्व अधोरेखित करताना गडकरी म्हणाले की, कोणत्याही राष्ट्राची क्षमता आज करण्यात येणाऱ्या संशोधन व दूरदृष्टीपूर्ण नियोजनावर अवलंबून असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यात संशोधन व तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ज्ञानाचे प्रत्यक्ष आर्थिक व सामाजिक मूल्यामध्ये रूपांतर झाले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
पर्यायी इंधनांच्या क्षेत्रातील सरकारी उपक्रमांची माहिती देताना म्हणाले की, भाताच्या काडी कचऱ्यापासून जैव-बिटुमन (बायो-बिटुमन) तयार करून एक किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या अवशेषांचा उपयोग होत असून पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील टप्प्यात पिके व जैवकचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीवर भर दिला जात असून, हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उद्योजकांची गरज!
नैसर्गिक संसाधनांवर आधारित उद्योग उभारण्यात आयआयटीतील विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे नमूद करत देशाला केवळ कुशल कर्मचारी नव्हे, तर उद्योजकांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नवकल्पना, संशोधन आणि उद्योगशीलतेच्या जोरावर रोजगारनिर्मिती होऊ शकते आणि त्यातूनच भारताची आर्थिक ताकद वाढेल, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.