

नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील व तेलकामठी व धापेवाडा मंडळातील गावांमध्ये २६ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीसदृश्य झाली. यामुळे तिडंगी,तिष्टी(खु),तिष्टी(बु), तेलगांव , दाढेरा , मांडवी या गावांमध्ये शेतीपिक व संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झाले.
प्राथमिक अंदाजानुसार, ३४१० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. उद्या सोमवारी सकाळी महसूलमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या भागाचा दौरा करणार आहेत. जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या आदेशानुसार पंचनामे सुरू केले आहेत. गेल्या २ दिवसापासून युध्दपातळीवर पंचनामे सुरू आहेत. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, कोणीही नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, याची दक्षता तालुका प्रशासन घेत आहे.