

Vidhan Parishad Election Mahayuti Seat Sharing
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत ९९ टक्के चर्चा पूर्ण झाली आहे. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये अंतिम चर्चा होऊन उद्यापर्यंत अधिकृत घोषणा केली जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
यासाठी दिल्लीत बैठकीची आवश्यकता नसून राज्यातील प्रमुख नेते परस्पर चर्चेतून निर्णय घेतील. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने अनावश्यक खर्च टाळून निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. विविध मतदारसंघांत महायुतीकडे ७० टक्क्यांपर्यंत मतदानाचे संख्याबळ असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यातील पाणीस्रोतांचे ऑडिट करण्यासाठी “पाण्याचा सातबारा” हा प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे स्रोत, पाण्याचा उपसा आणि भूजल पुनर्भरण यांचे परीक्षण करण्यात येईल. महसूल, ग्रामविकास आणि पाणीपुरवठा विभाग संयुक्तपणे ही योजना राबविणार असून याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे.
महसूल विभागाला जीपीआर अहवालात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल बोलताना बावनकुळे यांनी विविध दाखले व प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुलभ केल्याचे सांगितले. महसूल विभाग आणि आयटी विभागातील अधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे जनतेला उत्कृष्ट सेवा देता येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित वादाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मला कोणताही वाद झालेला वाटत नाही. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ काल रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबत होते. त्यामुळे वादाच्या बातम्या कुठून येतात, हे माहिती नाही.
ओबीसी कॅबिनेट सबकमिटीची बैठक नुकतीच पार पडल्याची माहिती देत बावनकुळे म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी सरकार घेईल,
नवीन नागपूर आणि नव्या रिंग रोड प्रकल्पासाठी शासनाने दिलेला मोबदला समाधानकारक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. प्रभावित शेतकऱ्यांना भूखंड देण्यात येणार असून या प्रकल्पासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी महसूल विभागाने माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागपूरमधील नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावांनाही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीची अनेक नावे असल्याच्या तक्रारी आहेत. एसआयआरमुळे मतदार यादी शुद्ध आणि पारदर्शक होईल. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह करण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया आवश्यक असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
वसतिगृहामधील विद्यार्थिनीच्या तक्रारीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, संबंधित विद्यार्थिनी सोबत मी स्वतः संवाद साधला असून तिचे अनुभव ऐकले आहेत. हे प्रकरण गंभीर असून समाजकल्याण मंत्र्यांशी चर्चा करून संबंधित वॉर्डनवर योग्य कारवाई करण्याची विनंती केली जाणार आहे.