

Bachchu Kadu On Farmer Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबतच्या अटी काढून टाकण्याची घोषणा केल्यानंतर यासाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी कर्जमुक्तीसाठी आम्ही वर्षभर आंदोलन केलं अन् सगळ्यांनी मिळून कर्जमाफी खेचून आणली. कार्यकर्ते माध्यम प्रतिनिधी, शेतकरी नेते यांचे देखील त्यांनी आभार मानले.
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, वर्षभर सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आंदोलने याचा देखील उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर या कर्जमुक्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा जोर लावला होता. त्यामुळं यामध्ये त्यांचाही मोठा वाटा असल्याचं म्हटलं.
बच्चू कडू म्हणाले, 'कर्जमुक्तीसाठी ३५० सभा, १० ते ११ दिवसांचा अन्नत्याग आणि त्यानंतर नागपूरमध्ये चक्काजाम हे टर्निंग पॉईंट ठरले. चक्काजाममुळं सरकारचं नाक दाबलं गेलं. यात सर्वात मोठा वाटा हा एकनाथ शिंदेंचा आहे. सीएम साहेबांची बैठक सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी जोर लावला तो फार मोठा होता. त्यामुळं मोठा वाटा हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. देवा भाऊंचे देखील आभार.'
यानंतर बोलताना बच्चू कडू यांनी जरी कर्जमाफीमधील काही अटी कमी झाल्या असल्या तरीसुद्धा मला असं वाटतं की कर्जमुक्तीपेक्षा हमी भावाच्या लढ्याला सुरूवात करणार आहे. कर्जमाफीमुळं डोक्यावरील बोजा कमी होतो. मात्र खिशात पैसे येत नाहीत. हमीभावाच्या लढाईसाठी पूर्ण प्लॅनिंग तयार आहे. आम्हाला लढावेच लागेल. सरकारची कानउघडणी सामन्य शेतकऱ्यांना करावीच लागणार आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याबाबत देखील बच्चू कडू यांनी वक्तव्य केलं. त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी हे सगळं चाललं आहे हे महत्वाचं नाही. तो विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे. एक दिवस पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत.
देवाभाऊंनी निश्चितच दिल्लीची तयारी करावी, देशाची सूत्रे हातात घ्यावीत. मात्र शिंदेंनी पुन्हा महाराष्ट्रात एन्ट्री करावी. देशात देवाभाऊ आणि महाराष्ट्रात शिंदे साहेब असा प्रवाश झाला पाहिजे. संजय राऊतांना टोला लागवताना बच्चू कडू म्हणाले की जंय भाऊंची भविष्यवाणी कधीच खरी ठरलेली नाही. त्यामुळं आता त्यांनी कोणत्या ज्योतिषाजवळ हात पाहिला त्यांचाच पाहिला की कोणाचा पाहिला माहिती नाही.