

Nagpur Hotels FDA Raid
नागपूर : नागपूर शहरातील हजारीपहाड येथील याराना हॉटेल, फेट्री येथील द हट आणि फ्रेंड्स कॉलनी येथील इंडियन तंदूर या तीन हॉटेलांचे अन्न परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रद्द केले आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत झालेल्या उल्लंघनांमुळे ही कारवाई करण्यात आली. अन्याय निवारण मंचाच्या तक्रारीनंतर एफडीएने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरमधील तीन नामांकित हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत त्यांचे अन्न परवाने रद्द केले आहेत. हजारीपहाड येथील याराना हॉटेल, फेट्री येथील द हट आणि फ्रेंड्स कॉलनी येथील इंडियन तंदूर या हॉटेलांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अन्याय निवारण मंचाच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी सामाजिक कार्यकर्ते राम सोलंके, मंगेश गायकवाड, महेश उईके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह संबंधित हॉटेलांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर संबंधित हॉटेलांनी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्यांचे अन्न परवाने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईनंतर ज्वाला धोटे यांनी समाधान व्यक्त करत अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे म्हटले. तक्रारीची तातडीने दखल घेऊन निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे तसेच आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आभार मानले.
दरम्यान, ज्वाला धोटे यांनी संबंधित तीनही हॉटेलांबाबत आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही हॉटेले अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील नागरिकांच्या तसेच शासकीय जमिनींवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आली आहेत. हरीश ग्वालबंशी, प्रेम ग्वालबंशी, शैलेश ग्वालबंशी आणि इतरांनी या जागांवर हॉटेल्स विकसित करून भाड्याने दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
याशिवाय, संबंधित आस्थापनांकडे आवश्यक बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) तसेच भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण मंचाने केली आहे.
मात्र, या आरोपांबाबत संबंधित हॉटेल मालक किंवा आरोप करण्यात आलेल्या व्यक्तींची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
अन्याय निवारण मंचाने भूमाफियांविरोधातील लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नागरिकांच्या जमिनी, सार्वजनिक मालमत्ता आणि अन्नसुरक्षेच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने संघर्ष सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.