

नागपूर: आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचे आहे, हाच आपला नव्या वर्षाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.१९) स्पष्ट केले.
आधुनिकतेसोबतच प्राचीन परंपरा संस्कृती सांस्कृतिक विरासत जतन करण्याचा हा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विकास आणि विरासत यावरच प्रामुख्याने भर दिला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज गुढीपाडवा नूतन वर्ष निमित्ताने नागपुरात निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर सांगितले.
मध्यंतरी राजीनामा नाट्यामुळे काहीसे नाराज असलेले मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार संदीप जोशी यांची नाराजीही आता दूर झाल्याचे उघड झाले. संदीप जोशी आणि मित्र परिवारातर्फे दरवर्षी ही शोभायात्रा आयोजित केली जाते. आपण आवर्जून या शोभायात्रेत सहभागी होत असतो, यावर त्यांनी भर दिला.
नागपूरचा सर्व परिसर एकप्रकारे यानिमित्ताने भगवा झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे सांगितले. नव्या वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केलेलीच आहे. हे वर्ष चांगले जावे, यासाठी ईश्वर पाठीशी आहे आणि भगवंताच्या कृपेने आम्ही देखील सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला.