

Child Marriage cases in Maharashtra 2024
नागपूर : राज्यात गेल्या ६ वर्षांत रोखण्यात आलेल्या बालविवाहांची संख्या तब्बल ५६६ टक्क्यांनी वाढली आहे. महिला आणि बालविकास आयुक्तालयाने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (RTI) दिलेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये १८७ बालविवाह रोखण्यात आले होते, तर २०२४-२५ च्या जानेवारी पर्यंत ही संख्या १,२४६ वर पोहोचली आहे.
ही वाढ चिंताजनक वाटत असली तरी, अधिकारी सांगतात की, ही वाढ प्रत्यक्ष बालविवाहांमध्ये झालेली नाही. जनजागृती व वेळीच झालेल्या हस्तक्षेप आणि कारवाईमुळे ही प्रकरणे उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे, असे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्तात म्हटले आहे.
महिला आणि बाल कल्याण आयुक्तालयाने आरटीआयमध्ये दिलेल्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये बालविवाह रोखल्याची सर्वाधिक ३७ प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यात नोंदवली गेली, तर नागपूरमध्ये एकही बालविवाह आढळला नाही. पुढील वर्षी बीड जिल्हा ३६ प्रकरणांसह आघाडीवर होता. मात्र २०२०-२१ पासून नागपूर विभागातही प्रकरणे नोंदवली जाऊ लागली. त्यावर्षी ११ प्रकरणे नोंदवली गेली होती. २०२४-२५ (जानेवारीअखेर) पर्यंत ही संख्या १३ वर गेली आहे, जी अहवालात लक्षणीय बदल दर्शविते. या कालावधीत सोलापूर व बीड जिल्हा बालविवाह रोखण्यात आघाडीवर होता. सोलापूरमध्ये २०२०-२१ मध्ये ६८ व २०२१-२२ मध्ये ७० प्रकरणे रोखली. २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये अनुक्रमे ११३ आणि १५९ प्रकरणांसह परभणी अव्वल होता.
सध्या बीड जिल्हा २०२४-२५ मध्ये जानेवारीपर्यंत १८७ प्रकरणांसह सर्वाधिक प्रकरणे रोखण्यात आघाडीवर आहे. आकडेवारीवरून असेही दिसून येते की, कोकण विभागाने गेल्या सहा वर्षांत सर्वात कमी प्रकरणे नोंदवली असून २०२१-२२ मध्ये फक्त एकदाच ५० प्रकरणे नोंदली गेली आहेत. ही संख्या प्रादेशिक पॅटर्न दर्शवते. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागांतील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बालविवाह रोखण्यात आले आहेत.
मार्च ते जून या काळात सर्वाधिक बालविवाह रोखले जातात, कारण याच कालावधीत पारंपरिक लग्नसराई सुरू असते आणि शाळांना सुट्टी देखील असते. अक्षय तृतीया या सणादरम्यान बालविवाहांचे प्रमाण सर्वाधिक असते.
अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सातत्याने एफआयआर दाखल करून कारवाई केली आहे. नागपूर विभागातील वर्धा आणि चंद्रपूर येथील प्रकरणांत सर्वाधिक हस्तक्षेप करण्यात आले. विभागांमध्ये छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक सरासरी बालविवाह रोखले गेले.
महिला आणि बाल कल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "बालविवाह रोखण्याच्या प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीचे कारण जनजागृतीमुळे आहे. अजूनही काही समुदाय या वाईट प्रथेवर विश्वास ठेवतात. परंतु गावांमधील अनेक लोक आता अशा प्रकरणांचा संशय आल्यावर आम्हाला कळवू लागले आहेत. १०९८ वर संपर्क केल्यास आमचे कर्मचारी त्यांच्यापर्यंत तत्काळ पोहोचतात हे त्यांना माहित झालं आहे."