

CAIT's decision to stop imports and exports worth Rs 1 lakh crore to Pakistan
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा निर्णय जाहीर केला आहे. असे असतानाच आता बिल्डिंग मटेरियल, साखर, खानपानाच्या अनेक वस्तूंची पाकिस्तानात होणारी निर्यात आणि तिकडून होणारी ड्रायफ्रुटची आयात येत्या 1 मे पासून बंद करण्याचा निर्णय व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना कॅटने घेतला आहे. या विषयीची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतीया यांनी मंगळवारी दिली.
सुमारे 1 लाख कोटीची निर्यात थांबवत पाकिस्तानचे आर्थिक आणि व्यावसायिक कंबरडे मोडण्याचा निर्णय आम्ही एक सैनिक म्हणून घेतल्याचे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बालकृष्ण भरतीया यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.
ओरिसा जिल्ह्यात भुवनेश्वर येथे 25 ते 26 एप्रिलला बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तान सोबत कुठलाही व्यवहार करायचा नाही असा निर्णय कंफड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व्यापारी संघटनेने (CAIT) घेतला. 250 मोठे व्यापारी आणि 40 हजार व्यापारी संघटन म्हणजे 8 ते 9 कोटी व्यापारी या संघटनेशी संलग्न आहेत. यामुळे 1 लाख कोटीचे किमान व्यवहार ठप्प होणार आहेत.
1 मे पासून हा निर्णय अंमलात येणार आहे. या संदर्भात लवकरच आम्ही केंद्र सरकारला कळविणार असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानला साखर, सिमेंट, लोखंड, बिल्डिंग मटेरियल, खान पान, खेळणे यासह अनेक वस्तू पाठवल्या जातात. आता हे सगळे पाठवणे बंद केले जाणार आहे. एकीकडे पाणी थांबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आता व्यापारी संघटनांच्या या निर्णयाने खाण्याचे साहित्य न पुरवता पाकची नाकाबंदी करण्याचा, कंबर मोडण्याचा निर्णय घेण्यात आला असेच म्हणता येईल.
तिकडे अगोदरच महागाई वाढली असल्याने खान्यापिण्याच्या वस्तू मिळणार नाहीत. फक्त ड्रॉयफ्रुट पाकिस्तानमधून आयात होते. त्याचा फारसा परिणाम भारतावर होणार नाही असा दावा भरतीया यांनी केला. यासाठी भारतीयांनी ॲडव्हान्स पैसे दिले असून ते मात्र अडकणार आहेत. व्यापारी वर्गाचे नुकसान होणार आहे. पण आम्ही व्यापारी सुध्दा सैनिक आहोत. आम्ही हे नुकसान देशाचे शिपाई म्हणून सहन करू. शेवटी देश हित महत्वाचे आहे. यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाशिवाय आम्ही आता पाकिस्तानात निर्यात सुरू करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. केंद्रातील मोदी सरकारनेही या घटनेला पाकिस्तान जबाबदार असल्याने पाकिस्तानवर अनेक निर्बध घालण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानशी असलेले सर्व आर्थिक व्यवहार रद्द करून पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आता भारतातील व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.