

नागपूर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे एनडीएचे महत्वाचे नेते आहेत. केंद्रातील नेतृत्व घटक पक्षांना नेहमीच झुकते माप देत नेतृत्व बळकट करण्याचे काम करते. महायुती मध्ये आम्ही भाजप मोठे भाऊ आहोत. घटक पक्षांना सांभाळताना आमचेही पक्ष संघटन वाढले पाहिजे ही आमची भूमिका आहे असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
विधानसभेत तीन कोटी १८ लाख मत घेऊन राज्यात सरकार आले तसंच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने महायुती निवडून येईल. नागपूर जिल्ह्यातील 27 नगरपालिका , नगरपंचायत निवडणूकित जनतेने आमचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आणावे अशी मी विनंती केली. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून 2047 डोळ्यापुढे ठेवत विकसित नगरपालिकेचा आराखडा आपण तयार करणार आहोत.
निवडणूक आयोगाने स्थगिती दिली त्याबाबत बोलताना मतदानाच्या एक दिवसा अगोदर असे धक्के देणे योग्य नाही. अभ्यास करावा लागेल.शेवटच्या 48 तासपूर्वी हे अनाकलनीय असल्याचे सांगितले.निवडणूक आयोगाने 23 तारखेलाच हा विचार केला असता तर एवढी तारांबळ उडाली नसती यावर भर दिला.
दरम्यान,शहाजी बापू पाटील यांच्याकडील कारवाईवर बोलताना कोणीतरी तक्रार करतो मग आयोगाला आपली कारवाई करावी लागते असे सांगत समर्थन केले.नागपूरच्या जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी आणि आम्ही सुरू केलेल्या विकास योजनेवर विश्वास आहे.
महायुतीत कटुता नाही
महायुतीत कटूता नाही. 3 तारखेला निकालाच्या दिवशी सर्वकाही कळेल. संध्याकाळी आम्ही बसू, चार तारखेला बसू, मतेमतांतरे दिसली पण त्याचा काही फरक पडणार नाही असा दावा बावनकुळे यांनी केला. खरंतर दोनशे मते घेऊन नाना पटोले जिंकून आले. वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये नाना पटोले बोलत आहेत. नाना पाटोले यांच्या साकोलीतील लोकांनी काँग्रेस सोडली, काँग्रेस किंचित होत चालली आहे.
ऑपरेशन लोटसची गरज नाही काँग्रेसचे अनेक नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मागे उभे राहतील. काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे नगरसेवक त्यांचे नेते त्यांना सांभाळत नाही, विसंवाद आहे,त्यामुळे अनेकजण भाजपात प्रवेश करीत आहेत.
निवडणुकीत जो पराभव होणार आहे त्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडेल अशी भीती नाना पटोले यांना वाटते, म्हणून नाना पटोले ऑपरेशन लोटस म्हणतात असा आरोप केला. आम्हाला खूप लोक भेटले.ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत मात्र त्यांना सांगितलं दोन तारखे नंतर विचार केला जाईल. काँग्रेस बचाव मोहीम सुरू आहे. काँग्रेस फुटणार असे नेत्यांना वाटते म्हणून अशा पद्धतीने नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.