Vijay Wadettiwar : नागपूर,चंद्रपूरसह काँग्रेसचे २० खासदार निवडून येतील: विजय वडेट्टीवार
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील 4 जागा कॉंग्रेस पक्षाने घोषित केलेल्या आहेत. चंद्रपूरची जागा अजून बाकी आहे. चंद्रपूरची जागा काँग्रेस जिंकण्यासाठी हायकमांड सावधपणे पाऊल टाकत आहे. गेल्यावेळी 1 जागा जिंकलो, यावेळी नागपूर,चंद्रपूरसह राज्यात २० जागा काँग्रेस जिंकेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलताना केला. Vijay Wadettiwar
रंगो की होली मनाने के बाद सारे काही ठीक होईल, चंद्रपूर १०० टक्के जिंकणारी जागा असेल, पूर्वी काँग्रेसचा एक खासदार होता, आता २० खासदार निवडून येतील, त्याची सुरुवात चंद्रपुरातून होईल. हायकमांडला अपेक्षित असा निर्णय होईल, शेवटी राज्यात की दिल्लीत माझी गरज असेल, तर तसा निर्णय होईल, असे सूचक संकेत वडेट्टीवार यांनी दिले. Vijay Wadettiwar
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५ लाखांचे मताधिक्य मिळविणार, असे जाहीर केले आहे. याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, प्रत्येकाला पाच लाखाचा आकडा कुठून येतो कळत नाही. आमचा नागपुरातील उमेदवार जोरदार आहे. पक्षाने मातीतील आणि मॅटवरील आणि मैदानावरचा पहेलवान उमेदवार दिला आहे. लढण्याचे डावपेच असलेला हा निष्णात उमेदवार आहे. यामुळे गेली अनेक वर्षे आमची असलेली नागपुरची जागा परत कॉंग्रेस प्रचंड मताने मिळवेल, असा दावा त्यांनी केला.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत एकत्र लढावे, अशी इच्छा होती. सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले, शेवटी निर्णय त्यांनी जाहीर केला. राज ठाकरेंवर एक तरी जागा द्या हो, अशी म्हणायची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत, एक अभ्यासू आणि हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी चार जागेचा विचार करावा, असे मविआचे म्हणणं होते. आंबेडकरांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देऊन उमेदवारांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांचा वसा घेण्याऱ्या लोकांच्या मतात फूट पडू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात सर्वांनी विचार करावा. नकीच त्यातून चांगले रिझल्ट येईल. दरम्यान, रामटेकची जागादेखील काँग्रेस जिंकणार, समोर उमेदवार कोणीही असू दे, हा धक्कादायक निकाल राज्यातला असेल. घाबरून अपेक्षित जागा मिळत नसल्याने महायुतीच्या उमेदवारावर निर्णय होत नाही. भाजपच्या अध:पतनाची सुरुवात महाराष्ट्रमधून आणि महाविकास आघाडीकडून होईल. चंदा घेऊन धंदा करणे, हे भाजपचे काम आहे. मी ओबीसीसाठी लढत आहे, कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी दिली, ती पार पाडली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जागा जिंकून देऊ, हा विश्वास मी हायकमांडला दिला आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा