![file photo](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2Fvadeettivar.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातले सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. महिला सुरक्षित नाहीत. राज्यात दु:शासनाच्या औलादी मोकाट फिरताहेत. त्यामुळे साड्यांऐवजी सरकारने महिलांना शस्त्रे वाटावीत. यामुळे त्या स्वत:चे संरक्षण करू करतील, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत राज्य सरकारवर तोफ डागली.
संबंधित बातम्या
अंतरिम अर्थसंकल्पात महिलांना साड्यावाटप करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा संदर्भ देत वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प उधळपट्टीचा, भ्रष्टाचाराला वाव देणारा आणि राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा आहे. अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक स्मारकांच्या घोषणा केल्या. निधीची घोषणा केली. मात्र, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा त्यात साधा उल्लेखही नाही, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.