भाजपाला दीडशेच्या वर जाऊ देणार नाही : प्रकाश आंबेडकर
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान मोदी ‘अबकी बार चारसौ पार’ असा कितीही दावा करीत असले, तरी देशातील जनता भाजपाला दीडशेच्या वर जाऊ देणार नाही. जे आपले कुटुंब सांभाळू शकले नाहीत ते काय देश सांभाळणार, अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि.१) केली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे आयोजित बहुजन सत्ताधिकार महासभेच्या निमित्ताने ते बोलत होते.
ते म्हणाले, आज संविधान, लोकशाही धोक्यात असताना मतदारांना विश्वास देणे महत्त्वाचे आहे. मतदार भाजप, आरएसएस विरोधात आहे. परंतु ज्याला निवडून दिले तो भाजपासोबत उद्या जाणार नाही, याची खात्री त्याला हवी आहे. येत्या निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास पहिला आघात लाभार्थ्यांवर होणार होणार आहे. उद्या बहुमताच्या बळावर निवडणुकाच होऊ नयेत, असा भाजपचा प्रयत्न असून भाजपवर धोरणात्मक टीका करण्याची हिम्मत विरोधकांमध्ये नाही. कारण त्यांच्या मनात ईडीची भीती आहे. मात्र ही विचारांची लढाई आम्ही जनतेच्या भरवशावर या पुढील काळातही लढणार आहोत, असेही डॉ. आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा :