नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात वेळेत निर्णय घेण्याची गरज होती. शेवटी सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढावे लागले. महाराष्ट्राच्या विधिमंडळ व्यवस्थेला कलंक लावण्याचे यानिमित्ताने काम झाले आहे. ते पावित्र्य कायम राहावे. आज जे चालले आहे ते बरोबर नाही. सुनील प्रभू यांचे संविधानामुळे आमदार झाल्याचा उल्लेख प्रोसेडिंगवर येऊ द्यायचा नसेल तर हे चुकीचे काम सुरू आहे. या पद्धतीने काळिमा लावण्याचे काम होत असेल, तर यावर नक्कीच अधिवेशनात विचारणा करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, इंडिया आघाडीची बैठक 12 डिसेंबरला नागपुरात होत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपली की याबाबत बसून निर्णय घेऊ, यावर अजून चर्चा झालेली नसल्याचे सांगितले. Nana Patole