नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मराठा समाजाची माफी मागून निपक्षपणे चौकशी करावी, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी असून दोषींवर कारवाई करावी. तसेच आरक्षण देणार असाल तर केव्हा देणार आहे हे स्पष्ट सांगावे? नसेल तर त्याला उपाय काय? हे सुद्धा स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाची जी दिशाभूल केली, ५० टक्क्यांवर आरक्षण गेल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळू शकत नाही. कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेऊन मराठा समाजाची दिशाभूल केली. आज आरक्षण देऊ शकत नसल्यामुळे हे आंदोलन चिघळवण्याचे आंदोलकांना चिथावण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. एकंदरीत दोन्ही बाजूने व्यक्त होणारी मते आणि मराठा समाजातून कालच्या लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यात व्यक्त होणारा संताप लक्षात घेता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा :