गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यातील बहुतेक दिवस कोरडे गेल्यानंतर या वर्षी अवघ्या १५ दिवसांच्या पावसाने इटियाडोह धरण बुधवारी (दि.२४) शंभर टक्के भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली असून इटियाडोह धरण परिपुर्ण भरल्यामुळे उद्या पासुन विसर्गाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात निसर्गाच्या सान्निध्यात इटियाडोह धरण असून गोंदिया जिल्ह्याचे वैभव मानले जाते. हे धरण शंभर टक्के भरल्यानंतर धरणाचे ओव्हरफ्लो पाहण्यासाठी जिल्ह्यातील नव्हे तर शेजारील भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटक येथील आनंद घेण्यासाठी हजेरी लावतात. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे धरण विशेषतः धरणातून विसर्ग सुरु झाल्यावर पर्यटकांचे पाय आपसूकच धरणाकडे वळतात. धरण १०० टक्के भरल्यामुळे विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड या बाजूच्या राज्यातूनही पर्यटक मोठ्या उत्साहाने इटियाडोह धरणाचा सौंदर्य न्याहाळण्यासाठी भेटी देत असतात.
इटियाडोह धरणाचे पाणी गोंदिया जिल्ह्यासह भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतीला रब्बी हंगामात सिंचन केले जाते. दरम्यान, धरण १०० टक्के भरल्याने शेतकर्यांची रब्बी हंगामातील पिकाची चिंता दुर झाली आहे.
धरण १०० टक्के भरलेला असून धरणाची पातळी वाढत असल्यामुळे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तरी नदी काठावरील गावांना तसेच जलाशयाच्या सांडव्या वरून ओव्हरफ्लो होणारा विसर्ग कमी जास्त असू शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतःची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा संबंधित विभागाकडून देण्यात आलेला आहे.