गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली येथे वैनगंगा नदीवर कृषी व पिण्याच्या पाण्यासाठी डांगोर्ली बॅरेजची उभारणी व्हावी याकरीता आमदार विनोद अग्रवाल यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून प्रकल्पासाठी शासनाने ३९५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजूरी दिली आहे. या बॅरेजमुळे परिसरातील ५ हजार ८६१ हेक्टर क्षेत्राला सिंचन होणार आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांनी आमदार होण्यापूर्वी २०१९ साली या बॅरेजच्या उभारणीसाठी आपण कटिबद्ध असून, हा महत्त्वाकांक्षी बॅरेज बांधून शेतकरी बांधवांना शेतीसाठी सिंचन व्यवस्था आणि गोंदिया शहरात २४ तास पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिले होते. तेव्हा या प्रशासकीय मान्यतेमुळे त्यांच्या आश्वासनाची पुर्ततः होणार आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वारंवार मांडलेला डांगोर्ली बॅरेजचा मुद्दा राज्याच्या महायुती सरकारने गांभीर्याने घेत अखेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. दरम्यान, डांगोर्लीचा हा बंधारा ३९५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणार आहे. तर मध्यप्रदेश राज्यातील वनजमीन आणि पाण्याखालील भागात येणारे अडथळे दूर करण्यासाठी सचिव स्तरावरही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वैनगंगा नदीच्या डांगोर्ली घाटावर नदीतील पाण्याची पातळी भरपूर असून पाणीचा ठहराव होत नसल्याने या पाण्याचा लाभ आजूबाजूच्या गावांना आणि गोंदिया शहराला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हता. मात्र, आता या बॅरेजच्या बांधकामामुळे तालुक्यातील ५ हजार ८६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. दरम्यान, सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीमुळे तालुक्यातील तेढवा, शिवनी, डांगोर्ली, देवरी, नवेगाव उपसा सिंचन योजनेसह अनेक गावांना पाण्याच्या सिंचनाचा लाभ होणार आहे, तर गोंदिया शहराला २४ तास पाणीपुरवठा करता येणार आहे.