

Maharashtra Adivasi Sahitya Charchasatra
गडचिरोली: केवळ प्रेम आणि ललित साहित्य लिहून चालणार नाही, तर तळागाळातील लोकांचं वास्तविक जीवन, त्यांच्या वेदना आणि संकटं यावरही लिहिलं गेलं पाहिजे. त्यांच्या जीवनांचं प्रतिबिंब साहित्यात उमटत नसेल, तर काय उपयोग, असा सवाल ज्येष्ठ संपादक, लेखक व विचारवंत प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी केला.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने साहित्य अकादमी आणि दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे आजपासून 'महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य' या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन प्रा.द्वादशीवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
साहित्य अकादमीचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर, मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख विनोद कुमरे, साहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेचे सदस्य डॉ.प्रमोद मुनघाटे, दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजाभाऊ मुनघाटे उपस्थित होते.
प्रा.द्वादशीवार पुढे म्हणाले, आदिवासींची संस्कृती ही तळागाळातील लोकांची असून, त्यांनी ती जपली आहे. आदिवासी साहित्याचे जनक आणि ते जोपासणारेही आदिवासीच आहेत. परंतु उच्चभ्रूंनी त्यावर केवळ शिक्के मारले. साहित्यात केवळ उपलब्धींचीच नव्हे, तर संकटांचीही चर्चा व्हायला हवी. आदिवासींच्या उगवत्या साहित्याकडे आदराने पाहिले पाहिजे. त्यांच्या आकांक्षांना साहित्यातून फुलोरा मिळावा, अशी अपेक्षा करुन प्रा.द्वादशीवार यांनी सोनम वांगचूक, उमर खालिद यांच्यावर आणि त्यांच्यासारख्या लढणाऱ्या लाखो लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध साहित्यिक बोलणार की नाही, असा सवाल केला.
आदिवासींचं विस्थापन संपलेलं नाही
आदिवासी हे खरे मालक आहेत. त्यांना अधिवासाचा अधिकार आहे. परंतु वनवासी संबोधून त्यांना शिक्षा दिली जात आहे. अनेक जाती शत्रूंना शरण गेल्या. परंतु आदिवासी कुणालाही शरण गेले नाही. त्यांचा विस्थापनाचा इतिहास आहे. महाभारत काळापासून सुरु झालेले विस्थापन अजूनही संपलेले नाही, असे सांगून प्रा.द्वादशीवार यांनी आदिवासींनी यापासून सावध राहावे,असा इशारा दिला.
कृत्रिम बुद्धीमत्तेचं आव्हान: प्रा.विनोद कुमरे
मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख विनोद कुमरे यांनी बीजभाषण केलं. आदिवासी साहित्य स्वयंभू आहे. ते कुठल्याही साहित्याचं डुप्लीकेशन नाही. मात्र, नव्या तंत्रज्ञानात यापुढे लिपी आणि ध्वनीचाही वापर होणार नाही. न लिहिता व न बोलता आपला संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहचवता येईल. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हे पुढचे आव्हान असेल, असे प्रा.कुमरे म्हणाले.